बार्शी तालुका पोलिस ठाण्यात फिर्यादी रमेश शेंडगे यांची तक्रार नोंद
चित्रा न्युज प्रतिनिधी
सोलापूर :-बार्शी ते कुसळंब रस्त्यावर सोमवारी दुपारी झालेल्या भीषण अपघातात दोघांचा जागीच मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना समोर आली आहे. अपघातात मृत्यू झालेल्यांमध्ये नानाभाऊ आप्पाराव शेंडगे (वय 62, रा. उपळाई, ता. कळंब, जि. धाराशिव) आणि विनायक हरिदास मुंढे (वय 71, रा. उपळाई) यांचा समावेश आहे. या प्रकरणी बार्शी तालुका पोलीस ठाण्यात फिर्यादी रमेश नानाभाऊ शेंडगे (वय 30) यांच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
फिर्यादी रमेश शेंडगे हे शेती व वाहन चालवण्याच्या व्यवसायातून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करतात. दि. 16 जून रोजी सकाळी ते आपले एम.एच.25/पी.5929 या क्रमांकाचे पिकअप वाहन घेऊन उपळाईहून बार्शी येथे माल खाली करण्यासाठी आले होते. त्यानंतर येरमाळ्याकडे जात असताना त्यांना सायंकाळी साडेचार वाजण्याच्या सुमारास त्यांच्या मित्राचा फोन आला. त्यामार्फत कळले की, त्यांचे वडील नानाभाऊ शेंडगे आणि विनायक मुंढे हे लुना मोटार सायकल (क्रमांक एच.एच.25/ए.एक्स.2562) वरून गावाकडे येत असताना कुसळंब गावाजवळ समोरून आलेल्या टिप्पर (क्रमांक एम.एच.13/सी.यू.6095) ने जबर धडक दिली.
या अपघातात नानाभाऊ शेंडगे यांचा जागीच मृत्यू झाला, तर विनायक मुंढे यांना उपचारासाठी बार्शी येथे हलविण्यात आले होते. मात्र, उपचार सुरू होण्यापूर्वीच त्यांचाही मृत्यू झाला. अपघातानंतर घटनास्थळी मोठी गर्दी झाली होती. घटनास्थळी लुना दुचाकी पूर्णपणे मोडून पडलेली आढळून आली. दुचाकीचे अंदाजे 10,000 रुपयांचे नुकसान झाले आहे.
रमेश शेंडगे यांनी दिलेल्या फिर्यादीत नमूद केले आहे की, टिप्पर चालकाने अत्यंत बेदरकारपणे, भरधाव वेगात, रोडच्या स्थितीकडे दुर्लक्ष करत वाहन चालवले. यामुळेच अपघात घडला असून दोघांचे बळी गेले. त्यामुळे त्यांनी टिप्पर वाहनचालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्याची मागणी केली.
या अपघाताबाबत बार्शी तालुका पोलीस ठाण्यात मोटर वाहन अधिनियम 184 तसेच भारतीय न्याय संहिता 106(1), 281, आणि 324(4) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी घटनेची तातडीने दखल घेत चौकशी सुरू केली आहे. टिप्पर चालकाविरुद्ध योग्य ती कायदेशीर कारवाई करण्यात येणार असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले.
0 टिप्पण्या