Ticker

6/recent/ticker-posts

फक्त माझ्यावरच कारवाई का? – लक्ष्मण गायकवाड यांचा सवाल; अतिक्रमण कारवाईत बार्शी नगरपालिकेवर पक्षपातीपणाचे आरोप

चित्रा न्युज प्रतिनिधी 
सोलापूर :-बार्शी शहरात अतिक्रमणविरोधी कारवाई करताना नियम सर्वांसाठी समान न लागू करता, केवळ निवडक व्यक्तींवरच कारवाई केली जात असल्याच्या गंभीर तक्रारी समोर येत आहेत. या पार्श्वभूमीवर लक्ष्मण गायकवाड या नागरिकाने नगरपालिकेच्या अतिक्रमण विभागावर पक्षपाती कारवाईचे आरोप करत, "फक्त माझ्याच पान टपरीवर कारवाई का?" असा सवाल उपस्थित केला आहे. याप्रकरणी अतिक्रमण विभागाने कारवाई करताना दुजाभाव केल्यास संबंधित अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याची मागणीही त्यांनी केली आहे.

गायकवाड यांनी महिन्याभरापूर्वी बार्शी नगरपालिकेच्या हद्दीतील एक नंबर शाळेच्या प्रवेशद्वारासमोर आपली पान टपरी उभारली होती. त्यांच्या म्हणण्यानुसार, "त्या ठिकाणी याआधीपासून अनेक टपऱ्या आहेत, म्हणूनच मी देखील तिथे टपरी टाकली." मात्र काही दिवसांपूर्वी त्यांच्या पायाला दुखापत झाल्यामुळे त्यांना टपरी उघडता आली नव्हती. दरम्यान, बार्शी नगरपालिकेच्या अतिक्रमण विभागाने कोणतीही पूर्वसूचना न देता त्यांच्या टपरीवर कारवाई केली आणि टपरी जीसीपी मशीनच्या सहाय्याने उचलून थेट एक नंबर शाळेच्या आवारात फेकून दिल्याचा गंभीर आरोप त्यांनी केला.

"तेथे आजही इतर टपऱ्या उभ्या आहेत, मग फक्त माझ्याच टपरीवरच कारवाई का झाली?" असा प्रश्न उपस्थित करत त्यांनी सांगितले की, "बार्शी शहरात अनेक ठिकाणी मोठ्या प्रमाणावर अतिक्रमण झालेले असून, नगरपालिकेने मात्र त्यांच्यावर कोणतीही कार्यवाही केलेली नाही."

गायकवाड पुढे म्हणाले, "अतिक्रमण हे चुकीचेच आहे. कारवाई व्हायलाच हवी, परंतु ती कारवाई सरसकट सर्वांवर झाली पाहिजे. फक्त निवडक आणि दुर्बल व्यक्तींवर कारवाई करणे, हे कायद्याच्या समानतेच्या तत्त्वाच्या पूर्ण विरोधात आहे. कायदा हा सर्वांसाठी एकच असतो. जर अतिक्रमण विभाग कारवाई करताना पक्षपातीपणा करत असेल, तर अशा अधिकाऱ्यांवर कायदेशीर कारवाई झाली पाहिजे."

गायकवाड यांनी बार्शीतील तलाव परिसर, बाजारपेठा, मुख्य रस्ते आणि नगरपालिकेच्या संरक्षणाधीन जागांवर झालेल्या अतिक्रमणांकडे लक्ष वेधले आणि प्रश्न उपस्थित केला की, "तिथे कारवाई का होत नाही? राजकीय, आर्थिक वा जातीय कारणांमुळे नगरपालिकेची ही दुर्लक्षनीती आहे का?"

‘माझा न्यूज’तर्फे ही ठोस मागणी करण्यात येत आहे की, अतिक्रमण विभागाने कोणताही भेदभाव न करता सर्वच बेकायदेशीर अतिक्रमणांवर त्वरित, समान आणि कायदेशीर कारवाई करावी. एखाद्या सामान्य नागरिकावरच अन्याय करत, राजकीय वा प्रभावी व्यक्तींना वगळणे हे प्रशासनाच्या निष्पक्षतेला बाधक ठरत आहे.


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या