चित्रा न्युज प्रतिनिधी
भंडारा, : महाराष्ट्र राज्याचे मृद व जलसंधारण, पर्यटन, उद्योग, सार्वजनिक बांधकाम, उच्च व तंत्रशिक्षण, आदिवासी विकास विभागाचे राज्यमंत्री इंद्रनील नाईक यांच्या भंडारा जिल्हा दौर्यानिमित्त आज जिल्हाधिकारी कार्यालयात विविध विभागांची आढावा बैठक घेण्यात आली.
या बैठकीत राज्यमंत्री नाईक यांनी संबंधित विभागांकडून कामांची सविस्तर माहिती घेतली व अधिक प्रभावीपणे शासकीय कामकाजावर लक्ष केंद्रित करून कामाचा पाठपुरावा करावा, तसेच त्याबाबतची माहिती वेळोवेळी सादर करावी, अशा स्पष्ट सूचना दिल्या.
बैठकीस खासदार, आमदार, जिल्हाधिकारी डॉ. संजय कोलते, जिल्हा पोलिस अधीक्षक, मृद व जलसंधारण, आदिवासी विकास, सार्वजनिक बांधकाम व इतर संबंधित विभागांचे अधिकारी उपस्थित होते.
मृद व जलसंधारण विभागाच्या आढाव्यात ‘गाळमुक्त धरण – गाळयुक्त शिवार’ या अभियानात प्रगती वाढविण्याच्या सूचना देण्यात आल्या. ‘जलयुक्त शिवार’ ही महत्वाकांक्षी योजना जिल्ह्यात प्रगतीपथावर आहे, अशी माहिती संबंधित अधिकाऱ्यांनी दिली.
आदिवासी विभागाने दिलेल्या माहितीनुसार, भंडारा जिल्ह्यात एकूण सात वस्तीगृह कार्यरत असून त्यापैकी दोन मुलांचे व दोन मुलींचे वस्तीगृह भंडारा शहरात आहेत. एकूण 675 विद्यार्थ्यांची वस्तीगृहात क्षमता आहे.
सार्वजनिक बांधकाम विभागाने आपल्या कामाचा आढावा सादर करताना सांगितले की, 100 दिवसांच्या कालावधीत 152 तलाठी कार्यालयांची बांधकामे पूर्ण झाली आहेत.
शहरातील रहदारी व्यवस्था सुरळीत करण्यासाठी आवश्यक उपाययोजना तातडीने राबवाव्यात, असे निर्देशही राज्यमंत्री श्री.नाईक यांनी यावेळी दिले.
या बैठकीला खासदार प्रशांत पडोळे आमदार राजू कारेमोरे यांच्यासह जिल्हाधिकारी व प्रशासनातील वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
0 टिप्पण्या