प्रवाशांची दिशाभूल, प्रशासनाचे मौन
चित्रा न्युज प्रतिनिधी
भद्रावती : नुकताच राज्यभरात ऐकीकडे भोंदुबाबा अशोक खरात यांचे प्रकरण चालु असताना दुसरीकडे राज्यातील एस. टी. बस मध्ये प्रवास करताना प्रवाशांच्या नजरेस एक विचित्र पण धोकादायक ट्रेंड पडत आहे."वशीकरण स्पेशालिस्ट","प्रेमप्रकरणात हमखास यश "," तोडगा २४तासात,"सौतन व दुशमनोंसे छुटकारा "अशा आश्वासनांनी भरलेल्या भोंदूबाबाच्या जाहिराती बसच्या आतील भिंतीवर, खिडक्यांवर आणि सीटच्या मागील बाजूस सर्रास झळकत आहेत. या जाहिरातींमुळे प्रवाशांची मोठ्या प्रमाणात दिशाभूल होत असल्याची चिंता व्यक्त केली जात आहे.
या जाहिरातींमध्ये मोबाईल क्रमांकासह गूढ उपायांचे आश्वासन दिले जाते. विशेषतः प्रेमसंबंध, वैवाहिक अडचणी, नोकरी - व्यवसायातील अडथळे यावर अचूक उपाय असल्याचा दावा केल्या जातो. ग्रामीण भागातील आणि मानसिक तणावात असलेल्या नागरिकांना अशा जाहिरातींचा अधिक फटका बसत असल्याचे मत सामाजिक कार्यकर्ते तथा अ. भा. अं. नि. स. शाखा भद्रावतीचे अध्यक्ष गजानन घुमे यांनी व्यक्त केले.
त्यांच्या मते, अशा जाहिराती केवळ अंधश्रद्धेला खतपाणी घालत नाही तर आर्थिक फसवणुकीचे जाळेही निर्माण करतात. अनेक प्रकरणात लोकांकडून हजारो रुपये उकळले जातात, मात्र प्रत्यक्षात कोणताही परिणाम होत नाही. नुकत्याच खरात प्रकरणामुळे राज्यातील भोंदू लोकांची धरपकड सुरू असून प्रशासनाने याकडेही लक्ष द्यावे.
महत्वाचे म्हणजे, राज्य परिवहन महामंडळाच्या बसेस मध्ये अशा जाहिराती कशा आणि कोणाच्या परवानगीने लावल्या जातात, हा प्रश्न उपस्थित होत आहे. प्रशासनाकडून यावर कोणतीही ठोस कारवाई होत नसल्याने या प्रकाराला मोकळीक मिळत असल्याचे दिसते.
अशा भ्रामक जाहिरातीवर जादूटोणा विरोधी कायदा २०१३अंतर्गत कारवाई होऊ शकते परंतु अंमलबजावणीच्या अभावामुळे भोंदूबाबांचे जाळे अधिकच मजबूत होत आहे.
दरम्यान, प्रवाशांनी अशा जाहिरातींना बळी न पडता सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात येत आहे तसेच संबंधित अधिकाऱ्यांनी तातडीने लक्ष देऊन या प्रकारावर कठोर कारवाई करावी, अशी मागणी अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन समिती तालुका शाखा भद्रावतीच्या वतीने करण्यात आली आहे.


0 टिप्पण्या