Ticker

6/recent/ticker-posts

शंभर दिवसांच्या कृती कार्यक्रमाची माहिती येत्या १ मे रोजी सर्व विभागांच्या संकेतस्थळांवर - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस


चित्रा न्युज प्रतिनिधी
मुंबई: राज्यात शंभर दिवस कृती आराखडा हा व्यापक प्रमाणात यशस्वी ठरला असून या अंतर्गत आता पर्यंत ४११ कामांची कार्यवाही पूर्ण झाली आहे. तर कार्यवाही सुरू असलेली ३७२ कामे आहेत, जी लवकरच पूर्ण होणार आहे. अशा पद्धतीने शंभर दिवस कार्यक्रमांतर्गत ८५ टक्के कामे पूर्ण करण्याची कौतुकास्पद कामगिरी विविध विभागांनी केली आहे. येत्या एक मे पर्यंत सर्व कामे पूर्ण करावीत तसेच  प्रत्येक विभागाने  आपल्या संकेतस्थळावर शंभर दिवस  कार्यक्रमाची माहिती  उपलब्ध करुन देण्याचे निर्दैश  मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी येथे दिले.

              सह्याद्री अतिथिगृह येथे शंभर दिवस कृती कार्यक्रमाच्या आढावा बैठकीचे आयोजन मुख्यमंत्री श्री.फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली झाली त्यावेळी त्यांनी संबंधितांना निर्दैशित केले. यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, संबंधित विभागांचे मंत्री,तसेच संबंधित अपर मुख्य सचिव,प्रधान सचिव,सचिव व इतर संबंधित उपस्थित होते.

             मुख्यमंत्री श्री.फडणवीस म्हणाले की, शंभर दिवस कृती आराखडा कार्यकर्म विभागांनी गांभिर्याने यशस्वी केला आहे. अनेक  विभागांनी यामध्ये उत्तम काम केले असून  जनतेला या माध्यमातून उपयुक्त आणि  तत्पर सेवा सुविधा उपलब्ध करून देण्यात आलेल्या आहेत. या पार्श्वभूमीवर शंभर दिवस कार्यक्रमाचा कालावधी १५ दिवस वाढविण्यात आला आहे . येत्या एक मे रोजी सर्व विभागांनी आपल्या संकेतस्थळावर विभागाने काय ठरवले होते तसेच  किती कामे  पूर्ण केलीत याची  माहिती  द्यावी. त्यासोबतच  जर काही कार्यवाही अपूर्ण  राहिली तर त्याची कारणे ही संकेतस्थळावर उपलब्ध करुन देण्याच्या सूचना यावेळी संबंधितांना दिल्या.

               तसेच यापुढे ही विभागांनी गतीमानतेने लोकोपयोगी कामे गुणवत्तेसह आणि कालमर्यादेत पूर्ण करावयाची आहे. लोकप्रतिनिधींच्या  पत्रांवर कार्यवाही तत्परतेने करण्यासाठी विभागांनी आपल्या स्तरावर एक यंत्रणा कार्यान्वित करावी. उद्दिष्टांच्या पूर्ततेच्या यशस्वी अमंलबजावणीसाठी तांत्रिक, प्रशासकीय वा इतर अनुषंगीक बाबींची तातडीने  पूर्तता करावी. विभागांनी उपलब्ध निधीचा सुयोग्य वापर करण्यास प्राधान्य देण्याच्या सूचना ही श्री.फडणवीस यांनी यावेळी दिल्या.

              या बैठकीत एकून २६ विभागांच्या कार्यवाहीचा आढावा घेण्यात आला. विभागांचे 938 मुद्द्यांपैकी 411 मुद्द्यांवर (44%) पूर्णतः काम झाले आहे. तसेच, 372 मुद्दे (40%) अंतिम टप्प्यात असून निश्चित वेळेत पूर्ण होतील. मात्र, 155 मुद्दे (16%) अद्याप पूर्ण झाले नाहीत. या कामांच्या पूर्ततेबाबत असलेल्या समस्यांची माहिती संबंधित विभागांनी दिली . त्यासाठी त्यांना 15 दिवसांचा अतिरिक्त कालावधी देण्यात आला आहे. सर्व विभागांनी कामे पूर्ण करुन एक  मे ला त्याची माहिती संकेतस्थळावर उपलब्ध करुन देण्याचे मुख्यमंत्री यांनी  निर्दशित केले.

               उपमुख्यमंत्री श्री.शिंदे यांनी शंभर दिवस कार्यक्रमांतर्गत विभागांनी गतीमान काम करुन लोकाभिमुख कार्यपद्धतीचा अनुभव जनतेला दिला आहे, त्यातुन  शासनाप्रती जनतेमध्ये चांगला दृष्टीकोन तयार होत आहे. अनेक विभाग चांगले काम  करत आहेत. शंभर दिवस कार्यक्रम ही संकल्पना उपयोगाची असून   जिल्हा स्तरावर ही चांगला बदल होत आहेत. अनेक प्रकल्प, मोठे कामे या शंभर दिवसाच्या कालावधीत करण्यात येत आहेत,अनेक पूर्ण झाली आहेत. त्यासोबत अनेक विभागांच्या  सेवा ऑनलाईन आल्या आहेत,त्याचा जनतेला विशेष लाभ होत आहे, या सर्व उत्तम कामगिरीसाठी श्री.शिंदे यांनी विभागांचे अभिनंदन केले.

                                                                 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या