मनसेनिकांनी मनसे स्टाईलमध्ये रस्त्याच्या मध्ये बेशर्मीचे वृक्ष लावून केले आंदोलन.
चित्रा न्युज प्रतिनिधी
धुळे : शिरपूर ते शहादा या मार्गावरील वाघाडी गावाजवळच्या रस्त्याची अवस्था अत्यंत बिकट झाली आहे. जागोजागी मोठमोठे खड्डे पडल्यामुळे हा रस्ता आता 'खड्ड्यात रस्ता की रस्त्यात खड्डे' अशा अवस्थेत पोहोचला आहे. याचा सर्वाधिक फटका वाघाडी येथील ब. ना. कुंभार गुरुजी माध्यमिक विद्यालयात येणाऱ्या विद्यार्थ्यांना बसत आहे. जीव धोक्यात घालून या विद्यार्थ्यांना शाळेत जावे लागत आहे. गेल्या वर्षभरात या खड्ड्यांमुळे अनेक निष्पाप लोकांचे जीव गेले आहेत आणि वाघाडीत अशी दुर्दैवी घटना घडू नये, यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे तालुकाध्यक्ष पुनमचंद मोरे अनेक वर्षांपासून पाठपुरावा करत आहेत.
१ मे महाराष्ट्र कामगार दिनाचे औचित्य साधून वाघाडी गावात मनसे कार्यकर्त्यांनी तीव्र आंदोलन केले. राष्ट्रीय महामार्ग विभागाचे जळगाव येथील अधिकारी ज्याप्रमाणे या गंभीर समस्येकडे डोळेझाक करून बघ्याची भूमिका घेत आहेत, त्याच पद्धतीने निषेध व्यक्त करण्यासाठी मनसेने खड्ड्यांमध्ये 'बेशर्मीचे वृक्ष' लावले.
यापूर्वी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने याबाबत उपविभागीय अभियंता, सा.बां. उपविभाग क्र.१ शिरपूर यांना निवेदन दिले होते. मात्र, सदर रस्ता राष्ट्रीय महामार्ग विभागाकडे वर्ग झाल्याचे लेखी कळवत त्यांनी हे निवेदन त्यांच्याकडे देण्यास सांगितले होते. त्यानुसार, हे निवेदन राष्ट्रीय महामार्ग विभागाला सादर करण्यात आले.
निवेदनात नमूद करण्यात आले आहे की, शिरपूर-शहादा रस्त्यावरील वाघाडी गावाजवळील पुलाच्या रस्त्याची स्थिती अत्यंत दयनीय आहे आणि प्रशासनाचे याकडे पूर्णपणे दुर्लक्ष होत आहे. या पुलाजवळच ब. ना. कुंभार गुरुजी हायस्कूल असून शहादा, बोराडी व वाघाडी गावातील नागरिकांसाठी हा प्रमुख मार्ग आहे. त्यामुळे या रस्त्यावर मोठ्या प्रमाणात वाहतूक असते. असे असतानाही, या पुलावरील रस्ता अपघाताचा केंद्रबिंदू बनला आहे. रस्त्यावर मोठे आणि खोल खड्डे असल्याने वाहनचालकांना मोठी कसरत करावी लागत आहे. प्रशासनाच्या या दुर्लक्षामुळे रस्त्याची ही दुर्दशा झाली आहे.
मनसेनिकांनी राष्ट्रीय महामार्ग विभागाला इशारा दिला आहे की, या रस्त्याचे काम तातडीने करण्यात यावे. यापुढे या रस्त्यावर किंवा पुलावर कोणत्याही प्रकारचा अपघात झाल्यास त्याची संपूर्ण जबाबदारी राष्ट्रीय महामार्ग विभागाची असेल. महाराष्ट्र नवनिर्माण सेना या निवेदनाद्वारे सूचित करत आहे की, जर रस्त्याचे काम त्वरित सुरू झाले नाही, तर मनसे आपल्या स्टाईलने खळखट्याळ आंदोलन करेल आणि त्या आंदोलनाच्या परिणामांची सर्व जबाबदारी राष्ट्रीय महामार्ग विभागाची राहील.
आंदोलनाच्या ठिकाणी निवेदन स्वीकारण्यासाठी तहसील विभागाचे मुख्य अधिकारी सानप हे उपस्थित होते. या आंदोलनात वाघाडी गावाचे पोलीस पाटील अमोल पाटील, मनसे जिल्हाध्यक्ष राकेश चौधरी, मनविसे सोनू राजपूत, शिरपूर तालुका अध्यक्ष पुनमचंद मोरे, शहराध्यक्ष पंकज मराठे, वाघाडी ग्रामपंचायत सदस्य विकी मोरे,नक्षत्र पाटील, विकी पाटील,मयूर कोळी,विनोद कोळी,शंकर ठाकरे,चेतन माळी, पिंटू मोरे, सतीश माळी,अशोक कोळी,पप्पू पाटील,लक्ष्मण पाटील, रवींद्र माळी, धनराज माळी, वाल्मीक वारूडे तसेच अनेक कार्यकर्ते आणि पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. शिरपूर शहर पोलीस ठाण्याचे पीएसआय सोनवणे आणि त्यांच्या टीमने आंदोलनाच्या वेळी सहकार्य केले.
0 टिप्पण्या