चित्रा न्युज प्रतिनिधी
जालना : जनतेमध्ये केंद्र व राज्य शासनाच्या विविध जनकल्याणकारी योजनांतविषयी जागरुकता निर्माण करण्यासाठी विश्वशांती विश्वपदयात्रा घेणारी पर्वतोरोहींची चमू जालना जिल्ह्यात दाखल झाली आहे. या विश्व पदयात्रेचे नेतृत्व करणाऱ्या गिनीज बुक व लिम्का बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड होल्डर अवध बिहारी लाल यांच्या चमूने जिल्हाधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ यांची भेट घेतली.
ही यात्रा डेंजर्स ॲडव्हेंचर्स अंतरवेद स्पोर्ट्सतर्फे राबविण्यात येत आहे. या चमूत जितेंद्र प्रताप, महेंद्र प्रताप, गोविंदा नंद हे पर्वतारोही सहभागी आहेत. या यात्रेने आतापर्यंत 11 देशांमध्ये एकूण 4.48 लाख किलोमीटरचा पायी प्रवास पूर्ण केला असून 2018 मध्ये जगातील सर्वोच्च शिखर माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्पपर्यंतची यात्रा यशस्वीरीत्या पूर्ण केली. यात्रेच्या माध्यमातून 14 कोटी 50 लाख वृक्षांचे वृक्षारोपण करण्यात आले.
देशभरातील 600 हून अधिक जिल्ह्यांमध्ये ही पदयात्रा झाली असून उत्तराखंड, मध्यप्रदेश, राजस्थान, उत्तरप्रदेश, गुजरात तसेच दमन-दीव व दादरा नगर हवेलीमध्येही जनजागृती कार्यक्रम राबवले गेले आहेत. महाराष्ट्रातील 36 जिल्ह्यांपैकी 29 जिल्ह्यांमध्ये यात्रा झाली असून त्यांनी जालना जिल्ह्यात आरटीओ, वनविभाग यांच्या समवेत विविध उपक्रम राबवले.
या यात्रेचा उद्देश केंद्र व राज्य सरकारच्या विविध योजनांचा प्रचार करणे आहे, ज्यात पर्यावरण व वन्यजीव संरक्षण, प्रदूषण नियंत्रण, पर्वत व नदी संरक्षण, बेटी बचाओ – बेटी पढाओ, रस्ते सुरक्षे संदर्भातील जनजागृती, जनसंवर्धन, स्वच्छ भारत मिशन अशा अनेक योजनांचा समावेश आहे. या यात्रे अंतर्गत शाळा, महाविद्यालये, ग्रामपंचायती व सार्वजनिक ठिकाणी जाऊन प्रत्यक्ष भेटी, व्याख्याने व जनजागृती कार्यक्रम राबविले जात असल्याची माहिती जितेंद्र प्रताप यांनी जिल्हाधिकारी डॉ. पांचाळ यांना दिली.
-*-*-*-*-*-
0 टिप्पण्या