जिल्हा प्रशासनाचे आवाहन
सिद्धार्थ डोंगरे विशेष प्रतिनिधी महा.चित्रा न्युज मो.9921927894
वाशिम : दरवर्षी प्रमाणे यावर्षी सुध्दा जिल्ह्यात डिसेंबर ते जानेवारी या कालावधीत थंडीची लाट येण्याची शक्यता आहे. तरी जिल्हयातील जनतेने थंडीच्या लाटेपासुन संरक्षण करण्याकरीता खबरदारी घेणे गरजेचे आहे. या लाटेदरम्यान जनतेने पुढील प्रमाणे खबरदारी घेणे आवश्यक आहे.
थंडीच्या लाटेदरम्यान काय करावे - टिव्हीवरील हवामानविषयक बातम्या बघाव्या, दैनंदिन वृत्तपत्रामधील हवामानविषयक बातम्या वाचाव्या. थंडीच्या लाटेपासून संरक्षण करण्याकरीता पुर्ण अंग झाकेल असे लोकरीचे,उबदार कपडे परिधान करावे. (शक्यतो सर्व अंग झाकलेले राहतील) डोक्यामध्ये टोपी/दुपट्टा पायामोजे व हातमोजे यांचा नियमित वापर करावा. घरात चप्पलचा वापर करावा व शक्यतो उबदार वातावरणामध्ये राहावे.
या कालावधीत ताप, सर्दी व खोकला यासारखे आजार उदभवू शकतात. याकरीता जवळच्या प्राथमिक आरोग्य केंद्र, उपकेंद्र अथवा खाजगी दवाखान्यात जाऊन वेळीच तपासणी करून उपचार करून घ्यावे. यादरम्यान प्रवास शक्यतोवर टाळावा. नियमीत कोमट (गरम केलेले पाणी) प्यावे, जेणेकरुन शरीराचे तापमान संतुलीत राहील. तसेच आपल्या घरातील, शेजारी किंवा गावामध्ये एकटे राहणारे, म्हातारे, वयोवृध्द व्यक्ती व लहान मुले यांची विशेष काळजी घ्यावी. घराची दारे व खिडक्या शक्यतो बंद ठेवाव्यात. अशाप्रकारे खबरदारी घेणे गरजेचे आहे.
थंडीच्या लाटेदरम्यान काय करू नये - थंडीच्या लाटेदरम्यान घराबाहेर जास्त वेळ राहु नये. थंडगार पाणी, मद्यप्राशन करु नये, जेणेकरुन शरीराचे तापमान कमी होणार नाही, याची खबरदारी घ्यावी. अचानक एखादया व्यक्तीच्या शरीराचे तापमान कमी झाल्यास शरीराची मसाज करु नये. अशावेळी शरीरामध्ये हुडहुडी भरल्यास त्याकडे दुर्लक्ष करु नये. कारण हे शरीराचे तापमान कमी होण्याचे चिन्ह आहे.
जिल्हयातील जनतेने वरीलप्रमाणे थंडीच्या लाटेपासुन संरक्षणाची खबरदारी घेणे गरजेचे आहे. असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे.


0 टिप्पण्या