परभणी:- दिव्यांगांसाठी राबविल्या जाणार्या योजनांची अंमलबजावनी निश्चित केली जाईल, असे ठोस आश्वासन महापालिकेच्या आयुक्त सौ. तृप्ती सांडभोर यांनी दिल्यानंतर प्रहार अपंग क्रांती संघटनेच्या दिव्यांग प्रतिनिधींनी आपले ठिय्या आंदोलन मागे घेतले.
येथील महापालिका कार्यालयात या संघटनेचे सुनील मुलगीर यांच्या नेतृत्वाखाली दिव्यांगांनी ठाण मांडून आंदोलन सुरु केले. राज्य शासनामार्फत दिव्यांगांसाठी अनेक योजना आहेत. परंतु, या योजनांची अंमलबजावनी पूरेशा प्रमाणात होत नाही, अशी खंत या दिव्यांगांनी व्यक्त केली. संजय गांधी निराधार योजनेत केवळ सातशे ते आठशे रुपयेच मानधन मिळत आहे. त्यामुळे दिव्यांगांची पिळवणूक होत आहे. जिल्हा बँकेतही पदोपदी अडवणूक होत आहे. अंत्योदय राशनकार्ड दिव्यांगांना त्वरीत देणे गरजेचे आहे, परंतु चिरीमिरी दिल्याशिवाय हे कार्ड मिळत नाही. दिव्यांग, मतीमंद प्रमाणपत्रही मिळत नाही. घरकुल योजनेचे विशेष अनुदान टप्प्या टप्प्यांऐवजी एकत्रितपणे मिळणे गरजेचे आहे, अशी खंत या आंदोलनकर्त्यांनी व्यक्त केली.
या आंदोलनात जिल्हाध्यक्ष सुनील मुलगरी, सय्यद अय्यास, रामा नालेगावकर, चंपत कदम, बाळासाहेब घाटूळ, भारत कटारे, अशोक डाके, निवृत्ती यादव, इंद्रजित मोहिते, भगवान वाघमारे, कृष्णा काळे ज्ञानोबा भरोसे आदी सहभागी होते.


0 टिप्पण्या