Ticker

6/recent/ticker-posts

रेल्वेरुळांलगत गटाराच्या पाण्यावर पिकतात भाज्या; प्रशासन काही बाेलणार की नाही?

सोनू क्षेत्रे जिल्हा प्रतिनिधी 
ठाणे मो.9834081563

ठाणे - रोज सकाळी ऑफिस वेळेत गाठण्यासाठी मुंबईकर लोकलच्या गर्दीत स्वत:ला झोकून देतात. एकापाठोपाठ स्टेशन मागे टाकत लोकल पुढे सरकते. या प्रवासात रेल्वेरुळालगत हिरवाईने नटलेले भाज्यांचे छोटेछोटे मळे दिसतात. त्यात असतो पालक, लाल माठ, मेथी आणि तत्सम भाजीपाला. काँक्रीटच्या जंगलात ही हिरवळ डोळ्यांना सुखावणारी असली तरी याच भाज्या मुंबईकरांच्या ताटात पडतात तेव्हा त्या आरोग्याला घातक ठरतात, असा आक्षेप  अनेक वर्षे घेतला जात आहे. मात्र यावर काेणालाही गंभीरपणे संशाेधन करावे असे वाटत नाही, असे संशाेधन चालू असेल तर त्याचे निष्कर्ष रेल्वे प्रशासनाला सांगावे वाटत नाही. रेल्वेरुळांच्या बाजूला तरारलेले विषारी सांडपाण्यावर पोसलेले हे भाज्यांचे मळे राेज मुंबईकरांच्या ताटात भाजी बनून जात आहेत. 
दादर ते परळ दरम्यान, मानखुर्द, कुर्ला, मुलुंड तसेच कळवा येथे मोठ्या प्रमाणात गटारीच्या पाण्याचा वापर भाजीपाला पिकविण्यासाठी केला जातो. मुंबई विभागात १२५ हून अधिक ठिकाणी हा असा भाजीपाला पिकवला जातो. येथून ठिकठिकाणी या भाजीपाल्याची विक्री केली जाते.
कल्याणजवळही घाण पाण्यावर पिकतो भाजीपाला रेल्वेरुळांलगत विषारी सांडपाण्याच्या जोरावर भाजीपाला पिकविण्याचे प्रकार ठाकुर्ली, कल्याण येथेही सर्रास चालत आहेत. मुळा, पालक, मेथी, कांदेपात अशा भाज्यांचा त्यात समावेश असतो. वांगीही पिकवली जातात, पण ती हाॅटेलात पाठविली जातात.   ठाकुर्ली, कल्याणला जाताना पत्रिपुलनजीक, कळव्याला जाताना बोगदा सोडला की त्या बाहेरील जागेत भाजी पिकवली जाते. पावसाच्या दिवसात पावसाचे पाणी मिळते, मात्र मिळेल त्या पाण्याने ही भाजी पिकवली जाते. खाडीच्या पाण्याचा वापर केला जातो. काही वर्षांपूर्वी या अशा भाज्या पिकवून नागरिकांचे आरोग्य धोक्यात घालणाऱ्या भाजी विक्रेत्यांवर कारवाई करण्यात आली होती.   रेल्वे मार्गालगतच्या झोपडपट्टीतील रासायनिक कारखान्यांनी सोडलेले सांडपाणी, अन्य उत्पादनांकरिता वापरून मोकळ्या जागेत सोडलेले पाणी याचा वापर करुन भाज्या पिकविल्या जातात.   अशी पालेभाजी लवकर पिकते, आणि ती लगेच काढून तिची जुडी बनवून नजीकच्या पाण्यात बुडवून स्वच्छ करायची आणि ती बोचकी बाजारात विक्रीसाठी पाठवली जाते.
गेल्या २५ वर्षांपासून रेल्वे रुळालगत भाजीपाला पिकविला जातो. त्याबाबत न्यायालयात खटलाही दाखल करण्यात आला होता. परंतु  जागांवरील अतिक्रमण रोखण्यासाठी भाजीपाला लावला जातो, असे रेल्वेकडून सांगण्यात येते. पण भाजीपाल्यासाठी केमिकल फॅक्टरीतून सोडण्यात आलेले विषारी पाणी वापरले जाते. तपासणीत  हा भाजीपाला घातक असून त्याने कॅन्सरसारखे आजार होऊ शकतात, असे समोर आले आहे. तरीदेखील रेल्वे कारवाईबाबत ढिम्म असून मुंबईकरांच्या जीवाशी खेळ सुरू आहे. 

- मधु कोटियन, अध्यक्ष, मुंबई रेल्वे प्रवासी संघ

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या