चित्रा न्युज ब्युरो
छत्रपती संभाजीनगर :-माजी खासदार इम्तियाज जलील यांच्यासह एमआयएमच्या 30 कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. छत्रपती संभाजीनगर येथे आंदोलन केल्याप्रकरणी हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी संसदेत डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या बोलताना कथित आक्षेपार्ह वक्तव्य केले होते. त्याच्या निषेधार्थ एमआयएमच्या वतीने आंदोलन करताना जमावबंदी आदेशाचे उल्लंघन आणि गाढवाचा वापर केल्याप्रकरणी ही कारवाई करण्यात आली आहे.
अमित शहा यांनी संसदेत बोलताना, आंबेडकरांचे नाव घेणे ही एक फॅशन झाली आहे. सगळीकडे आंबेडकर, आंबेडकर, आंबेडकर, म्हणायचे. त्यांनी देवाचे नाव इतक्या वेळा घेतले असते, तर स्वर्गात जागा मिळाली असती, असे वक्तव्य केले होते. त्यांच्या या वक्तव्यानंतर वातावरण चांगलेच तापल्याचे पहायला मिळाले. अमित शहा यांच्या निषेधार्थ ठिकठिकाणी आंदोलने करण्यात आली. एमआयएमच्या वतीने देखील छत्रपती संभाजीनगर येथे आंदोलन करण्यात आले होते.
एमआयएमचे माजी खासदार इम्तियाज जलील यांनी अमित शहा यांच्या निषेधार्थ छत्रपती संभाजीनगर येथे तीव्र आंदोलन केले. या आंदोलनात गाढवाचा वापर करण्यात आला होता. ज्यामुळे पोलिसांनी यावर आक्षेप घेत 30 आंदोलकांवर गुन्हा दाखल केला आहे. आंदोलकांनी जमावबंदी आदेशाचे उल्लंघन केल्याचेही पोलिसांनी म्हटले आहे.या कारवाईवर एमआयएम पक्षाने तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. हे आंदोलन शांततापूर्ण होते आणि जनतेच्या भावना व्यक्त करण्यासाठी करण्यात आले होते. मात्र, पोलिसांनी अत्यंत कठोर भूमिका घेतली आहे, असे पक्षाच्या वतीने सांगण्यात आले.
0 टिप्पण्या