चित्रा न्युज प्रतिनिधी
भंडारा:-प्रत्येक वर्षी पावसाळ्याच्या हंगामात आकाशीय वीज कोसळल्यामुळे राज्यातील विदर्भ भागात, विशेषतः भंडारा, गोंदिया, वर्धा इत्यादी जिल्ह्यांमध्ये शेतात काम करणारे शेतकरी, मजूर तसेच इतर ठिकाणी असणारे अनेक लोक व प्राणी मृत्युमुखी पडतात. भारतात दरवर्षी साधारणतः २५०० लोक विजेच्या धक्क्याने मृत्युमुखी पडतात, तर महाराष्ट्रात हा आकडा जवळपास १०० च्या आसपास असतो.
मान्सूनने देशाच्या काही भागांमध्ये आणि महाराष्ट्रातील गोवा, कोकण, मुंबई, पुणे आदी शहरांमध्ये जोरदार आगमन केलं असलं तरी मध्येच तो थोडा विस्कळीत झाल्यासारखा वाटतो आहे. भंडारा जिल्ह्यात अधूनमधून पावसाला सुरुवात झाली आहे आणि काही दिवसांत पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे.
पावसाबरोबरच आकाशातून वीज कोसळण्याचे संकटही येते. जमिनीवर कोसळणाऱ्या विजेचा दाब लाखो व्होल्ट्सचा असतो. भंडारा जिल्ह्यातील हरित पट्टा – म्हणजेच घनदाट जंगलाचा भाग – जो तुमसर, मोहाडी ते भंडारा तहसील परिसरापर्यंत पसरलेला आहे, या भागात वीज अत्यंत तीव्रपणे गडगडते व चमकते.
आपल्याला यापासून स्वतःचा बचाव करण्यासाठी खबरदारी घेणे आवश्यक आहे. पावसाच्या वेळी जर तुमच्या मानेखालचे केस उभे राहिले तर समजा की वीज कोसळण्याची शक्यता आहे. अशा वेळी:
* शेतामध्ये किंवा झाडाखाली थांबू नका
* उंच खांबाखाली उभे राहू नका
* चप्पल किंवा बूट न घालता मोकळ्या मैदानी भागात जाऊ नका
* मोबाईलवर बोलू नका
* घरी टीव्ही सुरू ठेवू नका
* तळे, सरोवरे, जलस्रोत इत्यादींमधून तात्काळ बाहेर या
या सर्व उपाययोजना लक्षात ठेवून आपण आपले अमूल्य जीवन वाचवू शकतो.
ग्रीन हेरिटेज सोशल फाउंडेशनतर्फे हा महत्वाचा संदेश देण्यात आला आहे. यासोबतच भंडारा जिल्हा प्रशासनाच्या आपत्ती व्यवस्थापन विभागाद्वारेही वेळोवेळी सावधतेबाबत सूचना दिल्या जातात.
**मा. जिल्हा प्रतिनिधी / संवाददाता**
0 टिप्पण्या