बोली साहित्य संघाच्या आभासी कविसंमेलनात प्रतिपादन
संघाच्या वर्धापनदिनाचे औचित्य
रवी भोंगाने साकोली
साकोली : बोली भाषेतील कवींनी बोलीतच कविता लिहाव्या. आपल्या कवितांचे रसग्रहण रसिकांना करू द्यावे. आपण ज्या भागात राहतो त्या भागाचे प्रतिबिंब कवितेत उमटणे गरजेचे असते. आजच्या कवितांमध्ये श्रगार कमी झालेला दिसतो. कविता सुंदर होण्यासाठी विविध अलंकारांचा वापर महत्वाचा असतो. बोली भाषीक कवींनी याकडे लक्ष देणे गरजेचे आहे असे प्रतिपादन बोलीमहर्षी व झाडीबोली साहित्य चळवळीचे जनक डाॅ.हरिश्चंद्र बोरकर यांनी मराठी बोली साहित्य संघाच्या २० व्या वर्धापनदिनी आयोजित आभासी कविसंमेलनात केले.
या संमेलनात महाराष्ट्रातील विविध भागातील बोली कवींनी सहभाग घेतला. कवीसंमेलनाच्या अध्यक्षस्थानी बोली संघाचे अध्यक्ष डाॅ.हरिश्चंद्र बोरकर तर प्रमुख अतिथी म्हणून पोवारी व झाडीबोलीतील सुप्रसिद्ध साहित्यिक अॅड. लखनसिंह कटरे उपस्थित होते. संघाचे उपाध्यक्ष बाळकष्ण लळीत यांनी मालवणी भाषेतील कविता सादर करून मार्गदर्शन केले. कन्नूलाल विटोरे ( कहारी बोलीभाषा), रविंद्र दळवी, निलेश कवडे (वर्हाडी), लोकराम शेंडे, उपेंद्र रोहणकर ( झाडीबोली), रूजोरियो पिंटो ( मालवणी), विजय निकम (अहिराणी), पालिकचंद बिसने, इंद्रकला बोपचे ( पोवारी) आदी कवींनी आपापल्या भाषेतील कविता सादर करून कार्यक्रमात रंगत वाढविली. अॅड. लखनसिंह कटरे यांनी प्रास्ताविकातून सद्य परिस्थिती व बोलीभाषा यासंदर्भात वैचारिक प्रबोधन करतांना सांगितले की प्रमाण मराठीच्या अमृृतधारा म्हणजे सर्व बोलीभाषा होत. त्यामुळे बोलीभाषेत संभाषण करतांना अजिबात लाजू नये.
कवीसंमेलनाचे रंगतदार सूत्रसंचालन ग्रामगीताचार्य बंडोपंत बोढेकर यांनी केले. तंत्र नियोजन व आभार प्रदर्शन कुंजीराम गोंधळे यांनी केले. यावेळी चंद्रकांत लेनगुरे, डाॅ.गुरूप्रसाद पाखमोडे, संत डोमाजी कापगते आदी अनेक मान्यवर आभासी पद्धतीने उपस्थित होते.


0 टिप्पण्या