चित्रा न्युज प्रतिनिधी
मुंबई : बोधगया येथील महाबोधी महाविहारावरील ब्राह्मणवादी वर्चस्व हटवून बौद्ध समाजाच्या ताब्यात देण्यात यावे, यासाठी गेल्या अनेक महिन्यांपासून आंदोलन सुरू आहे. काल बौद्ध भिक्षूंवर ब्राह्मण्यवाद्यांकडून हल्ले झाले. मोठ्या प्रमाणावर तिथे सरकारकडून बळाचा वापर करण्यात आला.
या आंदोलनाबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राहुल गांधी दोघेही मौन बाळगत आहेत, असा गंभीर आरोप ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी केला आहे.
मोदी आणि राहुल गांधी दोघेही महाबोधी मुक्ती आंदोलनासाठी आवाज उठवण्यास घाबरत आहेत. त्यांच्या हिंदुत्ववादी, ब्राह्मणवादी मतदारांना राग येईल, अशी भीती त्यांना वाटते. मोदी पहलगाम हल्ल्यानंतर बिहारमध्ये राजकीय सभा घेतात, पण महाबोधी महाविहार मुक्तीबाबत एक शब्दही काढत नाहीत. राहुल गांधींनी नुकताच बिहार दौरा केला होता, आता पुन्हा ते बिहारमध्ये आहेत, पण त्यांनीही या आंदोलनाबद्दल कोणतेही समर्थन किंवा वक्तव्य केले नाही.
“मोदी आणि राहुल गांधी हे दोघेही नकली आंबेडकरवादी आहेत. ब्राह्मणवाद आणि मनुवाद त्यांच्या रक्तात आहे. "एक नंबरी आहे, तर दुसरा दस नंबरी,” आहे असे टीकास्त्र त्यांनी सोडले.
याप्रसंगी त्यांनी भाजप व काँग्रेसवर जोरदार हल्ला चढवत म्हटले की, “ज्याप्रमाणे शिकारी प्राण्यांचे शिकार करण्यासाठी हाडांचे आमिष दाखवून पकडतो, त्याचप्रमाणे हे दोन्ही पक्ष बाबासाहेब आंबेडकरांचे फोटो आणि संविधानाचे आमिष वापरून दलितांची मतं मिळवतात. या पक्षांना दलितांवर प्रेम नाही, त्यांना फक्त दलितांची मते हवी असतात.”
महाबोधी महाविहार मुक्ती आंदोलनासाठी वंचित बहुजन आघाडी, भारतीय बौद्ध महासभा सातत्याने लढा देत असून याबद्दल जागरूकता निर्माण करत आहे. सलग 2 दिवस प्रकाश आंबेडकर हे स्वतः बोधगया येथील आंदोलनात सहभागी झाले होते. तसेच भारतीय बौद्ध महासभेचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष भीमराव आंबेडकर हेदेखील आंदोलनात सहभागी झाले होते. महाबोधी महाविहार मुक्ती आंदोलनासाठी वंचित बहुजन आघाडीकडून राज्यभरात स्वाक्षरी मोहिम राबविण्यात आली होती.
“आंबेडकरवाद्यांनो तुम्ही हे वेळेत समजून घ्या, नाहीतर हे दोन्ही विषारी साप तुम्हाला गोड विष देत राहतील,” अशा शब्दांत त्यांनी जनतेला सावध केले.
0 टिप्पण्या