Ticker

6/recent/ticker-posts

पत्रकारांना अपशब्द वापरणे आणि शिवीगाळ करणे हा गुन्हाच आहे .

👉 कायदा आणि शासनाची स्पष्ट भूमिका


 चक्रधर मेश्राम- 

नागपूर :-माध्यमे म्हणजे लोकशाहीचा चौथा स्तंभ आहेत. समाजातील अन्याय, भ्रष्टाचार आणि जनतेच्या समस्यांकडे सरकारचे लक्ष वेधणारे पत्रकार हे केवळ बातमीसाठी धावणारे नाहीत, तर ते एक सामाजिक जबाबदारी पार पाडणारे कार्यकर्तेही आहेत. त्यामुळे पत्रकारांवर होणारी अपमानास्पद वागणूक, शिवीगाळ, धमक्या आणि मारहाणीच्या घटनांकडे शासन अत्यंत गांभीर्याने पाहते. पत्रकारांना अपशब्द वापरणे, अपमानित करणे किंवा धमकी देणे हा केवळ असभ्यपणा नसून गंभीर दखलपात्र आणि अजामीनपात्र गुन्हा ठरतो. त्यासाठी  महाराष्ट्रात कायदेशीर संरक्षण  मिळावे म्हणुन  पत्रकार संरक्षण कायदा, 2017 लागु करण्यात आला. 
महाराष्ट्र हे भारतातील पत्रकार संरक्षण कायदा लागू करणारे पहिले आणि एकमेव राज्य आहे.
७ एप्रिल २०१७ रोजी हा कायदा विधानसभेत मंजूर करण्यात आला, तर ८ डिसेंबर २०१९ पासून तो प्रत्यक्षात लागू करण्यात आला.
या कायद्याअंतर्गत खालील तरतुदी करण्यात आल्या आहेत:
 शिक्षा आणि दंड
पत्रकारावर हल्ला करणाऱ्यास ३ वर्षांपर्यंत तुरुंगवास आणि ५०,००० रुपयांपर्यंतचा दंड, किंवा दोन्ही शिक्षा होऊ शकतात.. 
अशा प्रकारचे गुन्हे हे दखलपात्र (Cognizable) आणि अजामीनपात्र (Non-Bailable) असतात. म्हणजेच, पोलिसांना वॉरंटशिवाय अटक करण्याचा अधिकार असतो आणि जामीन लगेच मिळू शकत नाही.
जर एखाद्या पत्रकाराला किंवा मीडिया संस्थेच्या कार्यालयाला नुकसान पोहचवलं गेलं, तर त्या नुकसानाची भरपाई गुन्हेगाराकडून वसूल करण्याची तरतूद आहे.
पत्रकारांवरील हल्ल्याची चौकशी DYSP (उपविभागीय पोलीस अधिकारी) स्तरावर होते.
 IPC अंतर्गत अन्य कायदेशीर कारवाई
महाराष्ट्र पत्रकार संरक्षण कायद्याशिवाय, भारतीय दंड संहितेच्या (IPC) विविध कलमानुसार पत्रकारांवर होणाऱ्या अपशब्द, धमक्या आणि मारहाणीवरही कारवाई केली जाते:
कलम 323: मारहाण – १ वर्ष कारावास / दंड / दोन्ही
कलम 504: शांततेचा भंग करणारा अपमान – २ वर्ष कारावास / दंड / दोन्ही
कलम 506: जीवे मारण्याची किंवा गंभीर इजा करण्याची धमकी – कठोर शिक्षा होऊ शकते. 
 सर्वोच्च न्यायालयाचा स्पष्ट आदेश
फक्त शिवीगाळ केल्याने IPC कलम 294(ब) अन्वये गुन्हा होत नाही, परंतु ती शिवीगाळ जर शांतता भंग करण्याच्या हेतूने, धमकीच्या स्वरूपात किंवा सार्वजनिक ठिकाणी केली असेल, तर ती दंडनीय गुन्हा ठरतो. पत्रकारांवरील हल्ल्यांचे उदाहरण: सामाजिक जबाबदारीचा अपमान. 
अनेक वेळा पत्रकारांनी समाजातील महत्त्वाच्या प्रश्नांवर प्रश्न उपस्थित केल्याने त्यांना धमक्या, अपशब्द किंवा मारहाणीचा सामना करावा लागतो. ही कृती केवळ त्या पत्रकारावरील हल्ला नसून लोकशाही व्यवस्थेवरचा आघात आहे. त्यामुळे अशा घटनांमध्ये पत्रकारांनी तक्रार नोंदवून कायदेशीर संरक्षणाचा लाभ घ्यावे. हे अत्यंत आवश्यक आहे.
पत्रकारांना शिवीगाळ करणे, धमकावणे वा अपमान करणे हे कायद्याने गुन्हा असून, तो करणाऱ्यांवर कडक कारवाईची तरतूद आहे. पोलिसांनी अशा प्रकरणांकडे केवळ तक्रार म्हणून न पाहता, लोकशाही व्यवस्थेच्या सुरक्षेच्या दृष्टीने गांभीर्याने पाहणे गरजेचे आहे.
माध्यमकर्मींचे स्वातंत्र्य टिकवणे ही समाजाची जबाबदारी आहे. जर माध्यमे अबाधित राहिली, तरच समाजाला खरी माहिती मिळू शकते – आणि म्हणूनच, पत्रकारांना असुरक्षित वाटण्याची वेळ येणे हे कुठल्याही प्रगत लोकशाहीसाठी दुर्दैव आहे.
 जर तुम्ही पत्रकार असाल आणि तुमच्याशी गैरवर्तन झाले असेल, तर तातडीने पोलिसांत तक्रार नोंदवा आणि कायदेशीर कारवाईची मागणी करा. तुमचे हक्क सुरक्षित आहेत .

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या