चित्रा न्युज प्रतिनिधी
माहूर- गावातील सर्व नागरिकांनी संघटीत पणे प्रयत्न केल्यास मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियानात यशस्वी होण्यापासून कोणीही रोखू शकणार नाही असे प्रतिपादन महाराष्ट्राचे स्वच्छता दूत तथा आयटीआयचे प्रमुख राज्य मार्गदर्शक द.भ.प. साईनाथ महाराज बितनाळकर यांनी केले.
तालुक्यातील टाकळी ग्रामपंचायतच्या वतीने दि. ९ रोजी मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान अंतर्गत स्वच्छता अभियान कार्यक्रमात प्रमुख मार्गदर्शक म्हणून ते बोलत होते. सरपंच कुंडलिक तोडसाम यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झालेल्या कार्यक्रमास माहूर प.स.चे विस्तार अधिकारी श्री लोखंडे, प्राचार्य विश्वासराव जाधव, आनंद दतधाम आश्रमाचे प्रवक्ते भाऊराव पाटील हडसनीकर, जि.प.प्रा.शाळेचे मुख्याध्यापक सुधाकर चेवटे, सहशिक्षक खोंड़े, एकात्मिक बाल विकास प्रकल्प कार्यालयाचे पर्यवेक्षिका श्रीमती आढावे, प्रज्ञा चव्हाण, पत्रकार जयकुमार अडकीने, उपसरपंच प्रतिनिधी फय्याज फारुकी, ईश्वर काळे, देवानंद जाधव, पुंडलिक हुंबे, पंजाब पाटील दहीवडकर, राजू चुनाळकर, माजी सरपंच नामदेवराव पाटील, बाबाराव पाटील विनायक मुसळे आदीसह ग्रामपंचायतचे सर्व सदस्य, तंटामुक्ती अध्यक्ष भागवत जायभाये, शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष रुद्दशील भवरे आदीसह गावातील अनेक मान्यवर उपस्थित होते.
यावेळी विस्तार अधिकारी लोखंडे यांनी मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियानात ग्रा.पं. मार्फत राबविण्याबाबतचे सर्व उपक्रम व तालुका ते राज्य स्तरावर शासनातर्फे देण्यात येणाऱ्या पारितोषिकाबाबत सविस्तर माहिती दिली. पुढे बोलतांना साईनाथ महाराज म्हणाले की, मुंगीला जर दिल्लीला जायचे असेल तर अनेक महिने लागतील पण दिल्लीला विमानाने जाणाऱ्या एखाद्या व्यक्तीच्या खांद्यावर बसली तर काही तासात दिल्ली पोहचू शकते. त्यासाठी गावातील सर्व नागरिकांनी एकसंघ होऊन योग्य व्यक्तीचा हात धरून प्रयत्न केले तर वेळ कमी जरी असला तरी इच्छित ध्येय गाठता येते असे उदाहरण देऊन मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियानात यशस्वी व्हावे ह्या ग्रा.प.ला शुभेच्छा व आशीर्वाद दिले. त्यानंतर देवा दत्ता दत्ता च्या गजरात संपूर्ण गावात स्वच्छता अभियान राबविण्यात आले. जी.प. प्रा. शाळेत विद्यार्थ्यांना स्वच्छतेचे महत्व पटवून देण्यात आले. कार्यक्रमास गावातील बहुसंख्य सुजान नागरिक, अंगणवाडी कर्मचारी, बचत गटाचे पदाधिकारी व सदस्य शालेय विद्यार्थी महिला व पुरुष व शिष्य मंडळी बहुसंख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक ग्रामपंचायत अधिकारी व्ही.एस. जाधव यांनी केले.



0 टिप्पण्या