Ticker

6/recent/ticker-posts

व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या शुल्काचा भार हलका करणार शिष्यवृत्ती प्रक्रियेत पारदर्शकता आणि सुलभता-उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील


चित्रा न्युज प्रतिनिधी 
मुंबई : राज्यातील व्यावसायिक अभ्यासक्रमांना प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्ती अर्जाची प्रक्रिया अधिक सुलभ करण्यात आली आहे.मुलींना १०० शिक्षण शुल्क माफ आणि मुलांना ५०% शिक्षण शुल्क माफीचा लाभ देण्यात येत आहे. या निर्णयाविरोधी जे महाविद्यालय शुल्क आकारतील त्या महाविद्यालयांवर कारवाई करणार असल्याचे उत्तर उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी आज विधानसभेत दिले.
प्रलंबित शुल्क प्रतिपूर्ती आणि शिष्यवृत्ती वितरणातील अडचणींबाबत  विधानसभा सदस्य रईस शेख यांनी उपस्थित केलेल्या प्रश्नाला उत्तर देताना मंत्री पाटील बोलत होते.

   उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील म्हणाले की,विद्यार्थ्यांसाठी अनेक वेळखाऊ बाबी होत्या त्यांची सुलभता केली. शिष्यवृत्ती अर्जातील माहितीची संख्या १३८ वरून  ६६  पर्यंत कमी करण्यात आली आहे. आवश्यक कागदपत्रे १७ वरून ८ वर आणली आहेत.आता सीईटी डेटा थेट वापरला जाणार असल्याने विद्यार्थ्यांना वारंवार जात प्रमाणपत्र किंवा इतर कागदपत्रे सादर करावी लागणार नाहीत.कॉलेजेसची आर्थिक स्थिती लक्षात घेऊन पहिल्या हप्त्याचे वितरण लवकर केले जाईल. शिष्यवृत्तीच्या वितरणाला पगारापेक्षाही अधिक प्राधान्य देण्याचे निर्देश मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी दिले आहेत. जून महिन्यापासून याची अंमलबजावणी होईल. 

            उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील म्हणाले की,विद्यार्थ्यांसाठी 'अर्न अँड लर्न' सारखी नवीन योजना यातून  सुमारे ५ लाख विद्यार्थ्यांना दरमहा २हजार रुपये अतिरिक्त मानधन देण्याची योजना सरकार आखत आहे. या योजनेसंदर्भात अजून अधिकृत कोणतीही घोषणा नाही. याअंतर्गत विद्यार्थी विद्यापीठ किंवा कॉलेजच्या आवारात वृक्षारोपण, लायब्ररी व्यवस्थापन किंवा सामाजिक कामात मदत करतील. यासाठी सरकार, कॉलेज आणि सामाजिक संस्था मिळून निधी उभारतील. निर्वाह भत्ता ही योजना शहरांच्या वर्गवारीनुसार विद्यार्थ्यांना १० महिन्यांसाठी वसतिगृह भत्ता दिला जातो. मुंबई-पुण्यासारख्या शहरांसाठी दरमहा ६,००० रुपये (एकूण ६०,००० रुपये), महसूल विभागाच्या ठिकाणी ५,१०० रुपये आणि तालुका स्तरावर ४,८०० रुपये दिले जात आहेत.

         उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील म्हणाले की, थकीत देयके वेळेवर अदा करण्यासाठी काही वित्तीय संस्थांशी (उदा. फेडरल बँक) चर्चा सुरू आहे. सरकार व्याज देईल आणि या संस्था थेट विद्यार्थ्यांचे किंवा कॉलेजचे शुल्क अदा करतील, जेणेकरून विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होणार नाही.शासकीय योजनांचा लाभ मिळत असूनही जे कॉलेज विद्यार्थ्यांकडून अवास्तव 'इतर फी' आकारतील किंवा प्रवेश प्रक्रियेत अडवणूक करतील, अशा कॉलेजेसवर कठोर कारवाई केली जाईल. फॉर्म भरताना होणाऱ्या चुका टाळण्यासाठी राज्यात ४० केंद्रे सुरू केली जात आहेत. ही केंद्रे विद्यार्थ्यांना फॉर्म भरण्यासाठी आणि तांत्रिक अडचणी सोडवण्यासाठी मदत करतील. 
या प्रश्नाच्या अनुषंगाने विधानसभा सदस्य सुधीर मुनगंटीवार, कैलास पाटील यांनी सहभाग घेतला.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या