तरुणांच्या पुढाकारामुळे सरपंचांनीही हाती घेतली झाडू
प्रतिनिधी : राजेश येसेकर
चंद्रपूर : गावातील जागरूक व सुशिक्षित युवा पिढीने एकत्र येऊन विरूर स्टेशन येथील स्मशान घाट परिसरात श्रमदानातून स्वच्छता अभियान राबवले. तरुणांच्या या सामाजिक जाणिवेमुळे
सरपंच अनिल आलाम यांनीही स्वच्छतेत सहभाग घेत हाती झाडू घेतली.
‘आपले गाव, आपली जबाबदारी’ या भावनेतून राबवण्यात आलेला हा उपक्रम राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या ‘ग्रामसफाई’ संदेशाची जिवंत प्रचीती ठरला आहे.
गावातील तरुण विशाल देरकर, नानी राठोड, प्रेम श्रीकोंडावार, संस्कार निमलवार, शुभम भोस्कर, रोहन सोनी, श्रावण रेड्डी, करण कहार, अस्मित बोडेकर, स्नेहल मोरे, प्रतीक मोरे, साहिल अलोने, चेतन वरवाडे, अनिकेत चोचले, जीव तोडे, संजू वर्मा, आदित्य वर्मा, विकी सोनी, शीतिज तुराणकर, प्रवीण नांदेकर, पवन सोनी आदींनी श्रमदान केले.
या स्वच्छता मोहिमेत सरपंच अनिल आलाम यांच्यासह प्रतिष्ठित नागरिक राम अवतार सोनी व जगतसिंग वधावन आणि त्यांच्या सहकाऱ्यांनीही सक्रिय सहभाग नोंदवला.
ग्रामपंचायत प्रशासनाने सर्व युवा सैनिकांच्या सामाजिक जाणिवेचे कौतुक करत त्यांचा जाहीर सत्कार व अभिनंदन केले.
ग्रामपंचायत ही कोणत्याही एका संस्थेची नसून संपूर्ण गावाची आहे. लोकसहभागाशिवाय गाव स्वच्छ राहू शकत नाही, असे मत व्यक्त करत ग्रामपंचायत प्रशासन व युवा पिढी आता एकत्र येऊन विरूर स्टेशनला चंद्रपूर जिल्ह्यातील ‘आदर्श व स्वच्छ गाव’ बनवण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे सांगण्यात आले.
तरुणांनी दाखवलेली ही दिशा निश्चितच प्रेरणादायी असून गावातील स्वच्छता अभियान अधिक व्यापक होईल, असा विश्वास ग्रामस्थांनी व्यक्त केला.
-------------------------------------------------
युवकांच्या पुढाकाराने विरूर स्टेशन स्वच्छ
स्मशान घाट परिसरात श्रमदानातून स्वच्छता. सरपंचांनीही हाती घेतली झाडू. ग्रामपंचायतीकडून युवा पिढीचा सत्कार. गावाला आदर्श बनवण्याचा संकल्प.


0 टिप्पण्या