Ticker

6/recent/ticker-posts

विश्वगुरूच्या नादात मोदींनी भारताला मित्र ठेवला नाही!

दोन-तीन महिन्यांत पाकिस्तानसोबत पुन्हा युद्ध होईल! ॲड. प्रकाश आंबेडकर यांचे मोठे विधान


चित्रा न्युज प्रतिनिधी 
उल्हासनगर : पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या कालावधीत विश्वगुरूच्या नादात त्यांनी भारताला एकही मित्र ठेवला नाही. ऑपरेशन सिंदूर युद्धाच्या वेळेस एक देश सुद्धा आपल्या सोबत उभा राहिला नाही. दोन-तीन महिन्यात पुन्हा एक युद्ध होईल. ते युद्ध सुद्धा पाकिस्तान सोबत होईल." असे गंभीर विधान वंचित बहुजन आघाडीचे नेते ॲड. प्रकाश आंबेडकर  यांनी केले. ते उल्हासनगर शहरात आयोजित सभेत बोलत होते.

ॲड. आंबेडकर यांनी महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीतील मतदानावर प्रश्नचिन्ह उपस्थित करत निवडणूक आयोगावरही निशाणा साधला. "महाराष्ट्र विधानसभेत ७६ लाख मतदान सायंकाळी सहानंतर झाले. मतदानाची वेळ संपल्यानंतर मतदान घ्यायचे असेल, तर निवडणूक आयोगाची नियमावली आहे. ती नियमावली पाळली पाहिजे, त्याचा रेकॉर्ड ठेवला पाहिजे आणि तो निवडणूक आयोगाला पाठवला पाहिजे." याबाबत वंचित बहुजन आघाडीने पत्राद्वारे माहिती मागवली असता, निवडणूक आयोगाकडे रेकॉर्ड नसल्याचे सांगण्यात आले. यावरून ॲड. आंबेडकर म्हणाले की, "जर रेकॉर्ड नसेल, तर ७६ लाख मतदान खोटं आहे." यासंदर्भात न्यायालयात (कोर्टात) जाऊनही कोणताही राजकीय पक्ष आपल्यासोबत आला नाही, अशी खंत त्यांनी व्यक्त केली.

याच सभेत ॲड. आंबेडकर यांच्या हस्ते ठाणे जिल्हा मध्यवर्ती कार्यालयाचे उद्घाटन तसेच, 'फ्री ॲम्ब्युलन्स' (विनामूल्य रुग्णवाहिका) सेवा आणि एका स्तंभाचे लोकार्पण देखील करण्यात आले.

संविधान जपण्याचे आवाहन :

ॲड. आंबेडकरांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे विचार मांडत संविधान जपण्याचे आवाहन केले. "डॉ. बाबासाहेब आंबेडकर म्हणाले होते की, स्वातंत्र्य जपणे हा आपला अधिकार आहे. जर स्वातंत्र्य जपायचे असेल, तर संविधान आपण जपले पाहिजे."

"जोपर्यंत संविधान आहे, तोपर्यंत मान-सन्मान आणि अधिकार आहे. ज्या दिवशी संविधान गेले त्या दिवशी मान-सन्मान आणि अधिकार गेला म्हणून समजा," असे महत्त्वपूर्ण विधान त्यांनी केले.

उल्हासनगर येथे झालेल्या भव्य जाहीर सभेत नागरिकांनी मोठ्या प्रमाणात प्रतिसाद दिला. या कार्यक्रमासाठी वंचित बहुजन आघाडीचे सर्व प्रमुख पदाधिकारी, कार्यकर्ते आणि नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थिती दर्शवली होती.


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या