चित्रा न्युज प्रतिनिधी
नांदेड :-हिमायतनगर शहरात आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा उभारण्यासाठी जागा उपलब्ध करून द्यावी, या मागणीसाठी प्रशासनाने वारंवार खोटी आश्वासने दिल्याने 'स्वाभिमानी संभाजी ब्रिगेड'ने आता आरपारची लढाई पुकारली आहे. आज २१ एप्रिलपासून हिमायतनगर नगरपंचायत कार्यालयासमोर बेमुदत आमरण उपोषण सुरू करण्यात आले असून, जोपर्यंत जागा मिळत नाही तोपर्यंत उपोषण मागे घेणार नसल्याचा पवित्रा आंदोलकांनी घेतला आहे.
हिमायतनगर शहरात छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासाठी जागा मिळावी, यासाठी 'स्वाभिमानी संभाजी ब्रिगेड'चे युवा तालुकाध्यक्ष माधव किसन शिंदे यांनी यापूर्वीही १७ फेब्रुवारी आणि ३१ मार्च रोजी उपोषण केले होते. त्यावेळी नगरपंचायत प्रशासनाने १५ एप्रिलपर्यंत ही मागणी पूर्ण करण्याचे लेखी आश्वासन दिले होते.
मात्र, प्रशासनाने दिलेल्या मुदतीत कोणतीही कार्यवाही न केल्यामुळे आणि आंदोलकांची फसवणूक झाल्यामुळे संताप व्यक्त होत आहे. जोपर्यंत छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याकरिता अधिकृत जागा उपलब्ध करून दिली जात नाही, तोपर्यंत हे बेमुदत आमरण उपोषण सुरूच राहील, असा इशारा निवेदनाद्वारे माधव किसन शिंदे यांनी मुख्याधिकाऱ्यांना देण्यात आला आहे. या आंदोलनामुळे हिमायतनगरमध्ये तणावपूर्ण शांतता असून शिवप्रेमींचा पाठिंबा वाढत आहे.


0 टिप्पण्या