संजय गांधी-श्रावण बाळ योजनेत 'मयतांच्या' नावाने करोडोंचा घोटाळा
चित्रा न्युज प्रतिनिधी
चंद्रपूर : जिल्ह्याच्या इतिहासात पहिल्यांदाच एकाच वेळी पाच तहसीलदार व दोन वरिष्ठ लिपिकांविरुद्ध गुन्हा दाखल करण्याचे आदेश वरोरा न्यायदंडाधिकारी प्रथम श्रेणी कोर्टाने आज दिले आहेत. संजय गांधी निराधार योजना व श्रावण बाळ योजनेतील लाभार्थ्यांच्या नावाने बोगस, बनावट बिले काढून करोडो रुपयांची लूट केल्याचा हा महाघोटाळा आहे.
सन 2017 ते 2025 पर्यंत सलग 8 वर्षे हा घोटाळा सुरू होता. मयत लाभार्थ्यांच्या नावाने खोटे बिले तयार करून शासकीय तिजोरीवर दरोडा. तत्कालीन चार तहसीलदार + विद्यमान तहसीलदार जिवती असे पाच तहसीलदार व दोन वरिष्ठ लिपिक.
सामाजिक कार्यकर्ते विनोद खोब्रागडे, वरोरा यांनी हा महाघोटाळा उघडकीस आणला. त्यांनी शासन-प्रशासनाकडे वारंवार पाठपुरावा केला, मात्र अधिकाऱ्यांनी फक्त बघ्याची भूमिका घेतली. अखेर खोब्रागडे यांनी वरोरा JMFC कोर्टात क्रिमिनल केस दाखल केली व मुख्य आरोपींविरुद्ध तात्काळ गुन्हे दाखल करण्याची मागणी केली.
दि. 04/06/2026 रोजी न्यायदंडाधिकारी प्रथम श्रेणी, वरोरा यांनी संपूर्ण युक्तिवाद ऐकून भारतीय न्याय संहिता अधिनियम 2023 च्या कलम 61(1), 199, 316(5), 318(4), 3(5) नुसार वरोरा पोलिसांना तात्काळ FIR दाखल करण्याचे आदेश दिले.
"सदरचा गुन्हा सात वर्षांपेक्षा जास्त शिक्षेचा असल्याने सर्व आरोपींना तात्काळ अटक करावी. मयत निराधारांच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्या या अधिकाऱ्यांना कोणताही दिलासा मिळू नये," अशी मागणी विनोद खोब्रागडे यांनी केली आहे.
आठ वर्षे हा घोटाळा सुरू होता, तेव्हा जिल्हाधिकारी कार्यालय, समाजकल्याण विभाग झोपले होते का?, ऑडिटमध्ये हे बोगस बिले कसे पास झाले ऑडिटरचीही चौकशी होणार का?, फक्त तहसीलदारच दोषी की यामागे 'वरपर्यंत' साखळी आहे?
हा आदेश जिल्ह्यातील महसूल यंत्रणेला मोठा हादरा देणारा आहे. आता पोलिस कारवाईकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
-----------------------------------------------------
चंद्रपुरात महसूलचा 'मयत घोटाळा' उघड!
वरोरा कोर्टाचा दणका - 5 तहसीलदार, 2 लिपिकांवर FIR चे आदेश. 2017 पासून मयत लाभार्थ्यांच्या नावाने बोगस बिले काढून करोडोंची लूट. सामाजिक कार्यकर्ते विनोद खोब्रागडे यांच्या लढ्याला यश. प्रशासन 8 वर्षे बघ्याच्या भूमिकेत. आता अटक कधी?


0 टिप्पण्या