जिल्हास्तरीय ईग्नाईट महाराष्ट्र 2026 कार्यशाळेचे उद्घाटन
चित्रा न्युज प्रतिनिधी
वर्धा : ग्रामीण भागातील उद्योजकांनी प्रामुख्याने ब्रँडींग व विपणन याच्याशी संबंधित बाबींवर लक्ष केंद्रीत केले पाहिजे. बाजारपेठेत अधिक प्रभाविपणे सहभागी होण्यासाठी बदलत्या बाजारपेठेतील नवनवीन संधी तसेच केंद्र व राज्य शासनाच्या विविध योजना व उपक्रमांचा लाभ घ्यावा, असे प्रतिपादन जिल्हाधिकारी वान्मथी सी यांनी केले.
जिल्हा उद्योग केंद्राच्यावतीने जिल्ह्यातील उद्योजकांसाठी जिल्हस्तरीय ईग्नाईट महाराष्ट्र 2026 या कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. कार्यशाळेच्या शुभारंभाप्रसंगी जिल्हाधिकारी बोलत होत्या. यावेळी उद्योग सहसंचालक, एमआयडीस औद्योगिक संघटना, लघु उद्योग भारती, जिल्हा अग्रणी बँक व्यवस्थापक, जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी, रिझर्व बँक व्यवस्थापक, डीजीएफटी, आयडीबीआय बँक, न्यु इंडिया इन्शुरन्स, आयबीएफसी, महास्ट्राईड, नाबार्ड व आरसेटीचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
नागपूर विभागाच्या उद्योजक सहसंचालकांनी 31 डिसेंबर 2025 रोजी जाहिर केलेल्या नवीन औद्योगिक धोरण अंतर्गत उद्योग विकासाची रुपरेखा सादर केली. जिल्ह्यातील निर्यातीबाबत आढावा घेऊन निर्यात उद्योग कसे वाढवता येईल तसेच उद्योग विभागाच्या विविध योजनांबांबत उपस्थितांना मार्गदर्शन केले. कार्यशाळेस उद्योग संचालनालयाच्या मैत्री कक्षामार्फत व्हीसीद्वारे मैत्री कायदा 2023 व त्याअंतर्गत उद्योग सुलभीकरणासाठी महाराष्ट्र शासनाद्वारे सुरु करण्यात आलेल्या उपक्रमांची माहिती देण्यात आली.
यावेळी केंद्र शासनाच्या झेड उपक्रमामध्ये नोंदणी करण्याची सेवा उपलब्ध करुन देण्यात आली व प्रमाणपत्र देण्यात आले. उद्यम नोंदणी आणि आयात निर्यात प्रमाणपत्र नोंदणी देखील यशस्वीरित्या करुन घेण्यात आली. कार्यशाळेच्या अंतर्गत भरण्यात आलेल्या प्रदर्शनामध्ये राज्य शासनाचे सीएमईजीपी, पीएमएफएमई कार्यक्रम तसेच आरसेटी अंतर्गत लाभार्थ्यांच्या विविध उत्पादनाचे प्रदर्शन भरविण्यात आले होते. कार्यशाळेमधील उल्लेखनीय फलनिष्पती म्हणुन महास्ट्राईड मार्फत जिल्ह्यातील कृषि उद्योग विकासाच्या संधीबाबत चर्चा करण्यात आली.
विविध उद्योजकता विकास या विषयावर आयआयएमचे मेंनटर तनवीर मिर्जा व अंकुर अग्रवाल यांनी उद्योजकांना मार्गदर्शन केले. यासोबत उद्योग विकासातील वित्त, बँक, विमा, उद्योजकता विकास व निर्यात क्षेत्रातील संधी या विषयावर तज्ञांकडून मार्गदर्शन करण्यात आले. कार्यशाळेचा जिल्ह्यातील 350 पेक्षा जास्त उद्योजकांनी सहभाग घेऊन लाभ घेतला. आभार भागवत गाडेकर यांनी मानले.


0 टिप्पण्या